वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत होणार बदल, तीन संघांना एन्ट्री मिळताच स्वरूप बदलणार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत. आता स्पर्धेत एकूण 9 संघ सहभागी झाले आहे. पण पुढच्या पर्वात ही संघ 12 असणार आहे. आयसीसीने यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

World Test Championship: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं चौथं पर्व सुरू असून 2027 साली अंतिम सामना होणार आहे. यासाठी 9 संघांमध्ये टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची चुरस सुरू आहे. असं असताना आयसीसीने पाचव्या पर्वात बदल करण्याची तयारी केली आहे. या पर्वात संघांची संख्या 9 वरून 12 करण्याची तयारी सुरू झाली आहे. रिपोर्टनुसार, पुढच्या पर्वात तीन संघ नव्याने दाखल होणार आहेत. हे पर्व 2027 पासून सुरू होणार आहे. जय शाह यांच्या नेतृत्वात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तान या संघांचा सहभाग नोंदवला जाईल. तर भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांग्लादेश आणि श्रीलंका हे संघ आधीपासून या स्पर्धेत खेळत आहे. तीन संघ नव्याने दाखल होताच या स्पर्धेच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नियम काय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक दोन वर्षात संघ आपल्या आवडीच्या 6 संघांसोबत आपल्या देशात आणि विदेशात मालिका खेळते. यापैकी तीन मालिका देशात, तर तीन मालिका विदेशात होतात. यानंतर गुणतालिकेत विजयी टक्केवारीच्या आधारावर क्रमवारी ठरते. यात टॉप 2 संघ अंतिम फेरीत खेळतात. पण तीन संघांची एन्ट्री होताच यात बदल होण्याची शक्यता आहे. आता हा बदल कसा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. प्रत्येक संघासोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार की आणखी हे आता सांगणं कठीण आहे. पण कसोटी क्रिकेटचा दर्जा राखला जाईल असं नियोजन केलं जाईल. तसेच कसोटी क्रिकेटचा ओढाही वाढेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन
आतापर्यंत तीन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरले आहेत. पहिलं पर्व 2019-2021 ला पार पडलं. यात न्यूझीलंडने बाजी मारली आणि पहिलं जेतेपद मिळवलं. त्यानंतर 2021-2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने विजयी पताका फडकावली. तर 2023-2025 च्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताने पहिल्या दोन पर्वात अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली. तिसऱ्या पर्वात तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने अंतिम फेरी खेळता आली नाही. यंदाच्या पर्वातही भारताची कामगिरी काही खास नाही. त्यामुळे अंतिम फेरी गाठेल की नाही हे सांगणं कठीण आहे.
