सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला
इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका भारताने गमावली, पण चर्चेत विषय राहिला तो रोहित शर्माचा.. लॉर्ड्सवरील त्याचा शेवटचा सामना असेल आणि वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत नसेल या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्याने शतक ठोकून सर्वांचं तोंड गप्प केलं. यावर माजी क्रिकेट रवि शास्त्री यांनी रोखठोक मत मांडत रोहित शर्माची पाठराखण केली आहे.

भारत आणि इंग्लंड वनडे मालिका नुकतीच संपली, पण रोहित शर्माचा विषय काही संपण्याचं नाव घेत नाही. कारण आता पुढच्या दोन महिन्यात तरी वनडे मालिका नाही. त्यामुळे रोहित शर्मा संघात असेल की नाही? याबाबत त्याच्या चाहत्यांची द्विधा मनस्थिती आहे. वनडे मालिकेतील दोन सामन्यात रोहित शर्मा फेल गेला. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या आणि शेवटच्या सामन्याच्या वावड्या उठल्या. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना लॉर्ड्सवर खेळणार, या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर बीसीसीआयने या चर्चा खोडून काढल्या. रोहित शर्मानेही या मालिकेदरम्यान काही भाष्य केलं नाही. पण रोहित शर्माने लॉर्ड्सवरील तिसऱ्या सामन्यात आपल्या बॅटने चोख उत्तर दिलं. तसेच टीकाकारांची तोंड बंद केली आणि निवृत्तीच्या बातम्यांना पूर्णविराम दिला. रोहित शर्मा मंगळवारी किया ओव्हल मैदानात उपस्थित होता. द हंड्रेड 2026 मोहिमेला सुरूवात झाली आहे. एमआय लंडन आणि सनरायझर्स लीड्स यांच्यातील सामना पाहण्यासठी प्रेक्षक गॅलरीत होता. त्या दरम्यान रवि शास्त्री समालोचन करत होते आणि ते आपल्या भावना आवरू शकले नाहीत.
रोहित शर्माबाबत रवि शास्त्री काय म्हणाले?
रोहित शर्माकडे कॅमेरा फिरताच माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रवि शास्त्री यांच्या भावना उफाळून आल्या. त्यांनी रोहितच्या शतकाचं कौतक करत सांगितलं की, त्याने त्याच्या बॅटने मारलेली सणसणीत चपराक होती. समालोचक करणाऱ्या सहकाऱ्याने रोहित शर्मा मैदानात उतरला असा उल्लेख केला. तोच धागा पकडून रवि शास्त्री म्हणाले की, ‘हो, आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केल्यावर तो आता छान आणि निवांत असेल. त्या शेवटच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी खूप गदारोळ झाला होता. पण त्याने बॅटने एक जोरदार फटका मारून त्याला प्रत्युत्तर दिले. 138 धावा. लॉर्ड्सवरील त्याचे पहिले शतक. हो, त्याने सर्व काही अनुभवले आहे, कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपदे मिळवून दिली आहेत.’
Lord’s ➡️ The Oval
The Hitman is in attendance for the season opener! 😍#TheHundred 2026 👉 MI London vs Sunrisers Leeds | LIVE NOW! pic.twitter.com/5I9xYzOxrz
— Star Sports (@StarSportsIndia) July 21, 2026
आर अश्विन यानेही केली पाठराखण
माजी क्रिकेटपटू आर अश्विन याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या थेट भाष्य करत सांगितलं की, निवड समिती किंवा व्यवस्थापन या दोघांनाही हात लावू शकत नाही. आर अश्विन म्हणाला की, ‘जर त्यांना खेळायचं असेल, तर ते विराट आणि रोहितला हात लावू शकत नाही. हे त्यांच्या कर्तृत्वामळे आहे. रोहितने जवळपास 12 हजार धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला हात लावणं कठीण आहे. त्यात ते फलंदाज असल्याने त्यांना हात लावणं सोपं नाही. कारण लोकं त्यांना पाहायला येतात. जर त्यांना वगळलं तर ते घराचं छत कोसळल्यासारखंच होईल. ‘