वैभव सूर्यवंशी टीम इंडियात पदार्पण करणार का? 26 जून का आहे खास? जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचं वादळ घोंघावलं. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. असं असताना टीम इंडियात कधी खेळणार? याची चर्चा रंगली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील तिसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगला. या सामन्यावर पूर्णपणे राजस्थान रॉयल्सचं वर्चस्व दिसलं. पहिल्यांदा गोलंदाजी, त्यानंतर फलंदाजी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला बॅकफूटवर ढकललं. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने जोरदार फटकेबाजी केली. त्याने समोर येईल त्या गोलंदाजाला फोडून काढलं. त्याने फक्त 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याची आक्रमक खेळी पाहून त्याला टीम इंडियात कधी संधी मिळेल? याची चर्चा सुरू झाली आहे. माजी क्रिकेटपटूंच्या मते, वैभव सूर्यवंशी आता टीम इंडियात पदार्पणासाठी तयार आहे. त्याला आता संधी देण्याची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं आहे. माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू, मोहम्मद कैफ, अंबाती रायडू, पियुष चावला या खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीला संधी मिळेल असं मत व्यक्त केलं. वैभव सूर्यवंशीचा फॉर्म आणि टॅलेंट पाहता लवकरच टीम इंडियात पदार्पण करण्याची शक्यता आहे.
वैभव सूर्यवंशी कधी करणार पदार्पण?
आयपीएल 2026 स्पर्धा 31 मे 2026 रोजी संपणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 26 जून रोजी होणार आहे. या दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता आहे. संघात संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन सारखे दिग्गज खेळाडू असताना वैभव सूर्यवंशीला जागा मिळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. पण आयर्लंड दौऱ्यात त्याच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. कारण यानंतर टीम इंडिया वनडे आणि टी20 मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. अशा स्थितीत वरिष्ठ खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यात आराम दिला जाण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यानंतर या पर्वातील पहिल्याच सामन्यात आक्रमक बाणा दाखवला आहे. मोहम्मद कैफ म्हणाला की, ‘मागच्या पर्वात मी विचार केला होता की वैभव सूर्यवंशीला खूपच जास्त महत्त्व दिलं जात आहे. मला वाटत होतं की इतक्या कमी वयात त्याला पुढे नेऊ नये. पण एका वर्षानंतर मला असं वाटतं की तो पुढच्या लेव्हलसाठी तयार आहे.’ असंच काहीसं मत नवजोतसिंह सिद्धूने व्यक्त केलं. वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या 8 सामन्यात 29 षटकार मारले आहेत. तसेच 304 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 218.70 चा आहे. त्याच्या नावावर 1 शतक आणि 2 अर्धशतकं आहेत.