IPL 2026 : वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर पुन्हा एकदा ऑरेंज कॅप, नावावर केला मोठा विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेतील पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम नावावर केला आहे. वैभवने या सामन्यात एक मैलाचा दगड गाठला आहे. तसेच त्याने या स्पर्धेत पुन्हा एकदा ऑरेंज कॅप मिळवली आहे.

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर पुन्हा एकदा ऑरेंज कॅप, नावावर केला मोठा विक्रम
IPL 2026 : वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर पुन्हा एकदा ऑरेंज, नावावर केला मोठा विक्रम
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 28, 2026 | 10:38 PM

मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण वैभव सूर्यवंशीला तंतोतंत लागू होत आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने ही म्हण सिद्ध करून दाखवली आहे. अल्पवधीतच वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याच्या विक्रमांची आता क्रीडाविश्वात चर्चा रंगली आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यात वैभव सूर्यवंशीने एक एक काही काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यात आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. वैभव सूर्यवंशीने 9 सामन्यात 400 धावांचा पल्ला गाठला आहे. यात एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. वैभव सूर्यवंशीला 400 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 43 धावांची गरज होती आणि या सामन्यात त्याने तसंच केलं. वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकार मारत 43 धावांची खेळी केली. त्याने 268.75 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आयपीएलच्या एका पर्वात 230हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 400 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. वैभव सूर्यवंशीने 44.44 च्या सरासरीने आणइ 238.09 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. यात 36 चेंडूत 103 धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. वैभवने 167 चेंडूंमध्ये 400 धावा पूर्ण केल्या. याह वैभव सूर्यवंशीने 2019 मध्ये 188 चेंडूंमध्ये 400 धावा करणाऱ्या आंद्रे रसेलचा विक्रम मोडला. 2024 मध्ये अभिषेक शर्माने 195 चेंडूंमध्ये 400 धावा केल्या होत्या. तर मागच्या वर्षी निकोलस पूरनने 197 चेंडूंमध्ये 400 धावा पूर्ण केल्या होत्या.

वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पाय ठेवला आहे. त्याने आतापर्यंत 61 षटकार ठोकले आहेत. पदार्पणापासून आतापर्यंत सूर्यवंशीपेक्षा जास्त षटकार कोणत्याही फलंदाजाने मारलेले नाहीत. 46 षटकारांसह अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर पुन्हा एकदा ऑरेंज कॅप चढली आहे. त्याने 400 धावा केल्या आणि अभिषेक शर्माला मागे टाकलं. अभिषेक शर्माने 8 सामन्यात 380 धावा केल्या आहे. वैभव सूर्यवंशी 20 धावा अधिक करून पुढे निघून गेला आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपसाठी या दोघांमध्ये चुरशीची लढाई असणार आहे. आता अभिषेक शर्मा पुढच्या सामन्यात ऑरेंज कॅप पुन्हा मिळवतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us