UBT MP Spilt : राऊत रस्त्यावर कपडे फाडून फिरणार आहेत, एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या माणसाची जिव्हारी लागणारी टीका
UBT MP Spilt : "उबाठाने प्रत्येक बैठकीच, मेळाव्याच चित्रिकरण करुन ठेवायचं, फोटो काढून फ्रेम करुन ठेवायची त्यानंतर दोन महिन्यानंतरच्या होणाऱ्या मेळाव्यामध्ये, त्या बैठकीमध्ये तीच लोक त्यांच्या सोबत राहतात का? याचा सुद्धा फोटो काढायचा, त्यानंतर त्यांच्या पक्षाची प्रगती त्यांना समजून येईल"

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील 9 पैकी 6 खासदार फुटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थतता आहे. खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यातून वारंवार तो राग, चीड दिसत आहे. काल उद्धव ठाकरे गटाने बोलवलेल्या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित राहिले. त्यानंतर पक्षातील फुटीवर शिक्कामोर्तब झालं. संजय राऊत हे सध्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये खूप आक्रमक पद्धतीने बोलत आहेत. फुटलेले खासदार, एकनाथ शिंदे आणि भाजपवर ते प्रचंड टीका करत आहेत. काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी चक्क काही शिव्या दिल्या. त्याबद्दल त्यांना विचारल्यानंतर आमच्या मराठीत असं बोलतात हे त्यांनी उत्तर दिलं. फुटलेल्या खासदारांना जाब विचारण्याचं, तुडवण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांच्यावर सुद्धा पलटवार सुरु झाला आहे. “संजय राऊत म्हणजे शिवसेना नाही. संजय राऊत शिवसेनेत कधी आले?. संजय राऊत म्हणजे कुरबुड्या ज्योतिषी नाही. कदाचित पोपट घेऊन जे बाजारात बसतात, त्याप्रमाणे त्यांची स्थिती आलेली आहे. त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, त्यांना महत्त्व देण्याची गरज काय” अशी टीका ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. “ते पुन्हा राज्यसभेवर निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. काही दिवसांनी ते रस्त्यावर दगड मारत फिरणार आहेत. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये आणाव लागणार आहे, ते रस्त्यावर कपडे फाडून फिरणार आहेत. त्यामुळे अशा माणसाकडे तुम्ही का लक्ष देता?” असं नरेश म्हस्क म्हणाले.
वर्धापन दिन हा प्रगती झालेल्यांचा आहे, अधोगतीचा नाही
“राहुल गांधी यांची चमचेगिरी करणाऱ्यांवरती काय लक्ष द्यायचं, वर्धापन दिन कशाला म्हणतात, प्रगती झाली पाहिजे अधोगती नाही, आमचा वर्धापन दिन हा प्रगती झालेल्यांचा आहे, अधोगतीचा नाही” असं नरेश म्हस्के म्हणाले. “बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रगल्भ विचारातून आणि नेतृत्वाखाली असलेली ही शिवसेना आज एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारख्या नेतृत्वामध्ये, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या तत्त्वांवर दिवसेंदिवस वाढत आहे” असं नरेश म्हस्के म्हणाले.
