
सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल हे टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू आहेत. सूर्याकडे टी 20i संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर शुबमन वनडे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. शुबमनला नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेला दुखापतीमुळे मुकावं लागलं. तर शुबमनला टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर आता शुबमन आणि सूर्यकुमार हे टीम इंडियाचे सहकारी आता एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे यांच्यातील सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20i मालिका 3-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. भारताने यासह 2025 चा शेवट विजयाने केला. त्यानंतर आता टीम इंडिया मायदेशात नववर्षात न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20i मालिका खेळणार आहे. या दरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या निमित्ताने भारताचे हे स्टार खेळाडू आमनेसामने येणार आहेत. शुबमन देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबचं तर सूर्या मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात 8 जानेवारीला सामना होणार आहे. सूर्या आणि शुबमन यांच्यासमोर या सामन्यात एकमेकांचं आव्हान असणार आहे.
मुंबई आणि पंजाब हे दोन्ही संघ या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 24 डिसेंबरला खेळणार आहेत. या स्पर्धेसाठी मुंबई संघात 2 बदल करण्यात आले आहेत. सूर्यकुमार यादव आणि ऑलराउंडर शिवम दुबे या दोघांचा मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. सूर्या आणि शिवम या स्पर्धेत फक्त 2 सामनेच खेळणार आहेत. याबाबतची माहिती एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली आहे.
“सूर्या आणि शिवम या दोघांनी ते 6 आणि 8 जानेवारीला होणाऱ्या 2 सामन्यांसाठी उपलब्ध असतील अशी माहिती दिली आहे”, असं एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
“तसेच रोहित शर्मा साखळी फेरीतील 2 सामन्यात खेळणार आहे”, असंही एमसीए अधिकाऱ्यांनी सांगितलं. रोहित सिक्कीम आणि उत्तराखंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकतो. हे सामने 24 आणि 26 डिसेंबरला होणार आहेत.
दरम्यान सूर्या आणि शुबमन या दोघांसाठी ही स्पर्धा फार महत्त्वाची असणार आहे. सूर्या आणि शुबमन या दोघांना धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. शुबमनला 2025 वर्षात टी 20I क्रिकेमध्ये एकही अर्धशतक करता आलं नाही. शुबमनला फ्लॉप कामगिरीमुळे संघातून बाहेर करण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला सूर्याला टी 20I वर्ल्ड कपआधी लय प्राप्त करण्यासाठी ही स्पर्धा फार महत्त्वाची असणार आहे.