Video : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीचं आक्रमक सेलीब्रेशन, श्रेयस अय्यरने केलं असं काही…
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयानंतर या स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा वचपा आरसीबीने काढला. यापूर्वीच्या सामन्यात पंजाब किंग्सने आरसीबीचा पराभव केला होता. या सामन्यानंतर विराट कोहलीचा सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

चंदीगढच्या यादवेंदर सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने २० षटकात ६ गडी गमवून १५७ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हे आव्हान ३ गडी गमवून पूर्ण केलं. कोहलीने ५४ चेंडूत नाबाद ७३ धावा करत आरसीबीला विजय मिळवून दिला. या यशस्वी खेळीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवदत्त पडिक्कलने ३५ चेंडूत ६१ धावा केल्या आणि सामना आपल्या बाजूने वळवला.जितेश शर्माने नेहल वढेराच्या गोलंदाजीवर षटकार मारून सामना संपवला. कोहलीने आनंद व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहाने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे मोर्चा वळवला. आक्रमकपणे सेलीब्रेशन सुरु केलं. दोन दिवसांपूर्वी पंजाबकडून पराभूत झालेल्या आरसीबीने वचपा काढला होता. त्यामुळे असं सेलीब्रेशन सहाजिकच होतं.
विराट कोहलीच्या सेलिब्रेशनंतर श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागून होतं. श्रेयस अय्यरने हा विराट कोहलीचा आक्रोश शांतपणे स्वीकारला. हसत आणि डोके हलवत त्याच्या जवळ गेला. लगेचच दोघांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली आणि एकमेकांबद्दल असलेला आदर दाखवला. विराट आणि अय्यर यांच्यातील भावनिक क्षण क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाला स्पर्शून गेला. या सामन्यातून केवळ स्पर्धाच नाही तर खेळाडूंमधील आदर आणि मैत्री पुन्हा एकदा सिद्ध झाली.
Only Kohli can go from beast mode to gentleman in five seconds. Watch the full video, passion in the moment, grace right after. That’s an elite mentality.#PBKSvRCB #RCBvPBKS #ViratKohli pic.twitter.com/rokWrWDnnk
— Ashish (@ashOnloop) April 20, 2025
पराभवानंतर श्रेयस अय्यरने आपलं मनोगत व्यक्त केलं. “माझे शरीर ठीक आहे, ही फक्त एक किरकोळ समस्या आहे. या सामन्यानंतर सर्व काही ठीक होईल. आमचे फलंदाज पहिल्या चेंडूपासून खेळण्यास तयार आहेत, परंतु आम्हाला चांगली सुरुवात मिळत नाहीये. विकेट हळूहळू बदलत आहे, आम्हाला मध्यभागी गोलंदाजांचा धैर्याने सामना करावा लागतो. या विजयाचे संपूर्ण श्रेय कोहली आणि त्याच्या संघाला जाते. आम्हाला अजूनही विकेटच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आहे. आम्हाला मधल्या फळीत आणखी काही लोकांना पुढे आणण्याची गरज आहे. मला मोकळेपणाने खेळायचे आहे, मला माझ्या खेळावर विश्वास आहे. आमच्याकडे सहा दिवसांचा ब्रेक आहे, म्हणून ड्रॉइंग बोर्डकडे परत जाणे आणि शरीराचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे.’
