
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानला जात होता. पण मागच्या काही सामन्यातील कामगिरी पाहता आता तसं म्हणणं चुकीचं ठरलं आहे. सुपर 8 फेरीतील दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्या भारताचा 76 धावांनी पराभव झाला. त्यामुळे उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात लढत होणार आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकला तर टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहणार आहे. त्यामुळे या सामन्यात प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चर्चा रंगली आहे. कारण गेल्या सामन्यात टीम इंडियाची हाराकिरी झाली आहे. या सामन्यात अभिषेक शर्माला ठेवायचं की संजू सॅमसनला संधी द्यायची हे यावरून चर्चा रंगली आहे. कारण अभिषेक शर्मा आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात फेल गेला आहे. त्यामुळे त्याला ड्रॉप करण्याची मागणी होत आहे. असं असताना या चर्चेत आता दिग्गज ओपनर वीरेंद्र सेहवागने उडी घेतली आहे. त्याने थेट अभिषेक शर्माला प्लेइंग 11 मधून डावलण्याची मागणी केली आहे.
टीम इंडियाला झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळेल की नाही हे सांगणं आता कठीण आहे. कारण भारतीय फलंदाजीवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यात ओपनर अभिषेक शर्माची फलंदाजी हवी तशी झाली नाही. या स्पर्धेत तीन वेळा खातंही खोलू शकलं नाही. ही स्थिती पाहता माजी ओपनर वीरेंद्र सेहवागने अभिषेक शर्माला डावलण्याच्या सूचना दिल्या आहेत. क्रिकबझच्या कार्यक्रमात सेहवागने सांगितलं की, ‘जर मी असतो तर अभिषेक शर्माला ब्रेक दिला असता आणि संजू सॅमसनला संधी दिली असती. कारण हा एकच सामना असा की त्यात प्रयोग करू शकतो. जर हरलो तर मग शेवटी कोणालाही खेळवा. यासाठी फॉर्ममध्ये असलेल्या बेस्ट इलेव्हनला उतरवा.’
वीरेंद्र सेहवागने बॅटिंग ऑर्डरमध्येही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्याने सांगितलं की, ‘मला वाटतं की सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावा. तसेच तिलक वर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. किंवा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनच्या हिशेबाने किंवा बॉलर्सच्या हिशेबाने फलंदाजीला पाठवावं. सर्वात महत्त्वाचं आहे की बिंधास्त खेळावं. असं वाटते की भारतीय संघ दबावात खेळत आहे. फलंदाजांना आऊट होण्याचा दबाव वाटत आहे.’