IPL 2026: इशान किशन खास असण्याचं कारण काय? गौतम गंभीरने सर्व काही सांगितलं
आयपीएल 2026 स्पर्धेत इशान किशन कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. इशान किशनकडे सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा सोपवण्यात आलं आहे. असं असताना टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने इशान किशन इतका खास का आहे? याचं कारण सांगितलं.

Ishan Kishan: इशान किशनचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. पण दोन वर्षांपूर्वी त्याला टीम इंडियातून डावलण्यात आलं होतं. इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास भाग पाडलं होतं. तसेच चांगली कामगिरी केली तरच विचार केला जाईल असं सांगितलं होतं. इशान किशनने सर्व अग्निपरीक्षा दिल्या आणि पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवलं. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे इशान किशन पुन्हा एकदा टीम इंडियातील महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. पण गौतम गंभीरच्या मते इशान किशन टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरीमुळे नाही तर त्याच्या वागणुकीमुळे खास आहे. त्याचं असं वागणं गौतम गंभीरला खूपच भावतं. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने इशान किशन का खास आहे ते सांगितलं.
गौतम गंभीरने RevSportz सोबत चर्चा करताना सांगितलं की, इशान किशनने संघात पुनरागमन केल्यानंतर त्याची वागणं कमाल आहे. गौतम गंभीर म्हणाला की, ‘इशान किशनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत काय केलं हे मी सांगणार नाही. पण मी इतकं सांगेन की पुनरागमन करणं वाटतं तितकं सोपं नाही. मी अशा स्थितीतून गेलो आहे. कमबॅक केल्यानंतर डेब्यूपेक्षा जास्त नर्वस असता. इशान किशनने कमबॅकनंतर पहिला चेंडू जॅकब डफीचा खेळला. इतकंच काय तर पहिलाच चेंडू गोलंदाजाच्या वरून चौकार मारला. हे त्याचं कॅरेक्टर दाखवतं. त्याचा अंदाज दाखवतं की तो लवकर टीमच्या विचारात मिसळला. जर 5-6 चेंडू आरामात खेळला असता तरी मला काही चिंता नव्हती. पण त्याने तसं केलं नाही.’
गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, ‘मी यासाठीच सांगतो की खरंच भारतीय क्रिकेट भाग्यवान आहे. त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत. फक्त इशान किशनचं नाही तर आपल्याकडे अनेक चांगले यष्टीरक्षक फलंदाज आहेत. जेव्हा व्हाईट बॉलने चांगली कामगिरी करतात. ‘ दरम्यान, इशान किशन आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणार आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीत त्याने झारखंडचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वात विजय हजारे ट्रॉफीवर झारखंड संघाने नाव कोरलं होतं.
