आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याने काय परिणाम होणार? जाणून एका क्लिकवर
आयपीएल 2025 स्पर्धा 58व्या सामन्यानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या भ्याड हल्ल्याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर बीसीसीआयने हा निर्णय जाहीर केला आहे.

आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानकडून होणारे हल्ले पाहता खबरदारीचा इशारा म्हणून केंद्र सरकारने बीसीसीआयला सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची आज बैठक पार पडली. या बैठकीत ही स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 57 सामन्यांचा खेळ पूर्ण झाला आहे. तसेच 58 वा सामना अर्धवट राहिला आहे. त्यामुळे ही स्पर्धा पुन्हा आयोजित केली जाईल तेव्हा नव्याने खेळावा लागेल असं दिसत आहे. खरं तर या सामन्यात पंजाब किंग्सने चांगली सुरुवात केली होती. पण क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. कोणत्याही क्षणी सामन्याची बाजूने पालटू शकते. यामुळे हा सामना जेव्हा परत कधी स्पर्धा सुरु होईल तेव्हा नव्याने खेळवला जाईल, असं सांगण्यात आहे. या सामन्यामुळे प्लेऑफच्या गणितावर परिणाम होणार आहे. त्यामुळे हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. ही स्पर्धा पुन्हा कधी आयोजित केली जाईल याबाबत अस्पष्टता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, “देश युद्धात असताना क्रिकेट सुरू राहणे चांगले वाटत नाही.”
बीसीसीआयपुढे पुन्हा आयोजन करण्याचं आव्हान
आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक आणि खेळाडूंची उपलब्धता हे दोन्ही गोष्टींचा तालमेल बसवावा लागणार आहे. अजूनही 17 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. हे 17 सामने कसे आणि कुठे खेळवायचे याबाबत अजूनही काही स्पष्टता नाही. याच वर्षी भारतात महिला वनडे वर्ल्डकप होणार आहे. तर आशिया कप स्पर्धेचं आयोजनही केलं जाणार आहे. त्यामुळे मैदानं आणि इतर गोष्टींची जुळवाजुळव करावी लागेल. बांगलादेश दौऱ्यासाठी आणि आशिया कपसाठी राखीव ठेवलेली वेळ स्पर्धा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
आतापर्यंत तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आऊट झाले आहेत. मात्र उर्वरित सामन्यांमुळे प्लेऑफच्या गणितावर परिणाम होईल हे मात्र निश्तित आहे. तर प्लेऑफच्या शर्यतीत एकूण 7 संघ असून त्यांच्यात टॉप 4 साठी लढत सुरु आहे.
यापूर्वी 2021 मध्ये कोरोना काळात आयपीएल स्पर्धा स्थगित केली होती. कोरोना संकटात आयपीएल 2021 स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्यात आली होती. 4 मे 2021 रोजी आयपीएल स्पर्धा कोरोना रुग्ण वाढत असल्याने स्थगित केली होती. यानंतर आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये आयोजित केला होता. पहिल्या टप्प्यात 29 सामने, तर दुसऱ्या टप्प्यात 31 सामने झाले होते.
दरम्यान पुढच्या आयपीएल 2026 स्पर्धेत बीसीसीआय 74 ऐवजी 84 सामने करण्याचा विचार करत होते. पण या स्थितीमुळे सामन्यांची संख्या वाढवण्याचा तुर्तास थांबवावा लागेल. कारण करोना काळात आयपीएल 2021 मध्ये 4 मे 2021 रोजी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याच वर्षी सप्टेंबर महिन्याच्या मध्यात ही स्पर्धा सुरु केली होती. 31 सामने 19 सप्टेंबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 मध्ये खेळवले होते. या स्पर्धेचं जेतेपद चेन्नई सुपर किंग्सने मिळवलं होतं.