IND vs SL Test: गॉल कसोटीपूर्वी भारतीय फलंदाजांना हवेचा इशारा! गिलसेनेसमोर मोठं आव्हान

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. एक तर मालिका जिंकण्याचा भार आहे. त्यात श्रीलंकेत बहुतांश भारतीय खेळाडू कसोटी सामना पहिल्यांदाच खेळणार आहेत. त्यामुळे एक कठीण आव्हान असणार आहे.

IND vs SL Test: गॉल कसोटीपूर्वी भारतीय फलंदाजांना हवेचा इशारा! गिलसेनेसमोर मोठं आव्हान
IND vs SL Test: गॉल कसोटीपूर्वी भारतीय फलंदाजांना हवेचा इशारा! गिलसेनेसमोर मोठं आव्हान
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 12, 2026 | 1:41 PM

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आता फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. पण या सामन्यात भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार यात काही शंका नाही. एक तर भारतीय संघ श्रीलंकेत 9 वर्षांनी कसोटी मालिका खेळत आहेत. त्यामुळे संघातील अनेक खेळाडू या ठिकाणी पहिल्यांदाच खेळणार आहेत. फक्त तीन खेळाडूच मागच्या वेळी कसोटी सामना खेळले आहेत. त्यामुळे श्रीलंकेतील परिस्थितीचा बऱ्याच खेळाडूंना अनुभव नाही. त्यामुळे या स्थितीचा सामना करणं थोडं कठीणच जाणार आहे. गॉल क्रिकेट ग्राउंडमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. या मैदानात हवा हा देखील फॅक्टर आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी मोठं आव्हान असणार आहे.

वाऱ्याचा वेग आणि फलंदाजी!

टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलसह इतर काही खेळाडू श्रीलंकेत वनडे आणि टी20 सामने खेळले आहेत. पण रेड बॉल क्रिकेटचा अनुभव कोणाकडेच नाही. त्यात गॉलमध्ये कसोटी सामना खेळताना एक वेगळंच आव्हान असणार आहे. मग आता प्रश्न पडतो की हवेमुळे काय होऊ शकतं? तर गॉल मैदानाच्या भौगोलिक स्थितीमुळे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. गॉल हे हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसलं आहे. स्टेडियमच्या दोन्ही बाजू समुद्राने वेढलेल्या आहेत. या स्टेडियममधील स्थिती भारतातील इतर कोणत्याही स्टेडियमपेक्षा वेगळी आहे. चार बाजूंना काही मोठे स्टँड नाहीत, तर एक मोठा भाग मोकळा आहे. त्यामुळे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम होतो. वाऱ्याचा फिरकी गोलंदाजांवर अधिक परिणाम होतो.

गॉलची स्थिती काय?

श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू फरवीझ महरूफ यांनी सांगितलं की, ‘वारा आमचं प्रमुख अस्त्र आहे. आम्ही त्याला गॉलचा राजा म्हणतो. त्याने येथे बरेच बळी घेतले आहेत. वाऱ्याच्या दिशेने गोलंदाजी कशी करायची हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे गॉलमध्ये वारा हा प्रमुख घटक असेल. गोलंदाज वाऱ्याचा वापर करून चेंडूला वळण देऊ शकतात.’ भारतीय गोलंदाजांना त्याचा फायदा होईल का? त्यावर त्यांनी सांगितलं की, दोन्ही दिशांना जोरदार वारे वाहतात. त्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाजांना त्याचा अंदाज झटपट घ्यावा लागेल. वाऱ्याशी किती जुळवून घेतात, त्यानुसार ते ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us