World Cup 2025 Final: भारतीय महिला संघाला ऋषभ पंतने दिला खास संदेश, असं वाढवलं मनोबल Video
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे. या दरम्यान भारतीय संघात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने संघाचं मनोबल वाढवत एक संदेश दिला आहे.

Women’s World Cup 2025 Final India vs South Africa: इंडिया ए आणि दक्षिण अफ्रिका ए संघाविरुद्ध अनौपचारिक कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून चौथ्या दिवशी निर्णय लागणार हे स्पष्ट आहे. भारताला विजयासाठी 156 धावांची गरज असून ऋषभ पंत मैदानात नाबाद 64 धावांवर खेळत आहे. असं असताना भारत आणि दक्षिण अफ्रिका महिला संघात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना 2 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी इंडिया ए संघाचा कर्णधार ऋषभ पंतने महिला संघाला खास मेसेज दिला आणि त्यांचं मनोबल वाढवलं आहे. त्याने दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. भारतीय महिला संघाने आठ वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारली. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्कं केलं. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 338 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 5 गडी आणि 9 चेंडू राखून पूर्ण केलं.
इंडिया ए संघाचा कर्णधार ऋषभ पंतने व्हिडीओत सांगितलं की, ‘भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा. मला माहिती आहे की तुम्ही या वर्ल्डकप स्पर्धेत खूप चढउतार पाहीले आहेत. पण तुम्ही सर्वांना चुकीचं सिद्ध करून दाखवलं. तुम्हाला संपूर्ण देश पाहात आहे. तुम्ही घरच्या मैदानावर जेतेपद मिळवून इतिहास रचा.’ यावेळी रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन यांनीही भारतीय महिला संघाला शुभेच्छा दिल्या. भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांनी यापूर्वी वनडे वर्ल्डकप जिंकलेला नाही. त्यामुळे यावेळी क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळणार हे नक्की झालं आहे.
SPECIAL WISHES FROM CAPTAIN PANT & INDIA A PLAYERS FOR WOMEN’S TEAM IN WORLD CUP FINAL. 😍🇮🇳 pic.twitter.com/VNdYZ1Fbnn
— Johns. (@CricCrazyJohns) November 1, 2025
भारताने 2005 साली पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये अंतिम फेरी गाठली. पण यावेळेस इंग्लंडने पराभूत करत भारताच्या जेतेपदाचं स्वप्न भंग केलं होतं. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. साखळी फेरीतील सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभवाची धूळ चारली होती. आता त्यातून धडा घेत भारतीय संघ जेतेपदावर नाव कोरेल, असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे.
