तिकिटाच्या बदल्यात 5 कोटी मागितले..; क्रिकेटरचा TMC ला रामराम, ममता बॅनर्जी यांच्यावर धक्कादायक आरोप
तृणमूल काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा करता त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही आरोप केले आहेत. ज्यांना मोठी रक्कम देणं परवडत होतं, फक्त त्यांनाच तिकिट मिळवता आलं, असाही धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि या राज्यात भाजपने पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवला. टीएमसीचे माजी आमदार आणि पश्चिम बंगालचे माजी क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांनी तृणमू काँग्रेससोबत सर्व संबंध तोडले आहेत. टीएमसीचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनोज तिवारी यांनी आरोप केला की, 5 कोटी रुपयांची लाच देण्यास नकार दिल्यामुळे पक्षाने त्यांना हावडा इथल्या शिबपूर मतदारसंघातून तिकिट नाकारलं. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, टीएमसीने तिकिटासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. आता त्यांनी आपण टीएमसीपासून वेगळं झाल्याची घोषणा केली आहे. मनोज तिवारी हे बंगाल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये ते क्रीडा मंत्रीही होते. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 36 शतकं झळकावली आहेत.
तृणमूल काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या दारुण पराभवानंतर मनोज तिवारी यांनी पक्षातून निवृत्तीची घोषणा केली. ते म्हणाले, “टीएमसीच्या या पराभवाने मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. जेव्हा संपूर्ण पक्ष भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला असतो आणि कोणताही विकास झालेला नसतो, तेव्हा असंच घडतं. टीएमसीने केवळ त्यांनाच तिकिट दिलं, जे मोठी रक्कम देऊ शकत होते. यावेळी 70 ते 72 उमेदवारांनी तिकिटासाठी पाच कोटी रुपये दिले. माझ्याकडेही पैसे मागितले होते, पण मी नकार दिला. आता बघा, ज्यांनी पैसे दिले त्यांच्यापैकी किती जण जिंकले? माझ्यासाठी तृणमूल काँग्रेसचा अध्याय आता पूर्णपणे संपला आहे.”
ममता बॅनर्जींचं समस्यांकडे दुर्लक्ष
याविषयी तिवारी पुढे म्हणाले की, 2019 मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांना लोकसभेचं तिकिट देऊ केलं होतं, पण त्यांनी ते नाकारलं होतं. 2021 मध्ये ममता बॅनर्जी यांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा एकदा बोलावलं आणि ते शिबपूरमधून निवडणूक लढले. मनोज तिवारी यांनी आरोप केला की, ममता बॅनर्जी त्यांच्या समस्या ऐकून घेत नसत आणि त्यात सतत व्यत्यय आणत असत. “मी हावडा जिल्ह्यातील खराब गटारव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता, पण मला कोणताही पाठिंबा मिळाला नाही. विद्यमान आमदार म्हणून मी माझ्या भागातील गटारकामासाठी दारोदारी फिरलो, पण हावडा नगरपालिकेनं ऐकून घेण्यास नकार दिला. त्यांनी मूलभूत विकास प्रकल्पांनाही अडथळा आणला. मी जी काही कामं करून घेतली ती केवळ आमदार निधीतूनच नव्हे तर माझ्या खिशातूनही त्यात योगदान दिलं होतं”, असा आरोप त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांच्याबद्दल त्यांनी पुढे सांगितलं, “तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे. मला राज्यमंत्री या नावाखाली केवळ एक लॉलीपॉप दिला गेला, ज्याला प्रत्यक्षात काहीच अर्थ नव्हता. जर मी उभा राहून म्हणालो की, दीदी मला तुमचं लक्ष एका विशिष्ट समस्येकडे वेधायचं आहे. तर त्या आम्हाला मध्येच थांबवून म्हणायच्या की, माझ्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही. “
