आयपीएलमध्ये धावा करूनही वैभव सूर्यवंशीला वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची दारं बंदच? कारण की..
आयपीएल 2026 स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आतापर्यंत त्याच्या खेळीने सर्वाना प्रभावित केलं आहे. त्यामुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. पण तसं होणं कठीण दिसत आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जाणार आहे.पुढच्या दोन वर्षांचा विचार करता युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी कशी कामगिरी करतो याकडे बारीक नजर असेल. कारण वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. कारण वैभव सूर्यवंशीने वयाच्या 14व्या वर्षीच क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. मागच्या पर्वात त्याने शतक ठोकलं होतं. तेव्हा त्याचं वय फक्त 14 वर्षे होते. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने काही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर त्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला. तेव्हा त्याने गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतही त्याची बॅट तळपली. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात सहभागी करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी आयपीएल 2026 स्पर्धा ही खूपच महत्त्वाची असणार आहे. पण या स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही वैभवला टीम इंडियात एन्ट्री मिळणं कठीण दिसत आहे. वनडे फॉर्मेटमध्ये तर ते शक्यच नाही.
वैभव सूर्यवंशीला का डावलणार?
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पीटीआयच्या वृत्तात एक खुलासा करण्यात आला की, आयपीएलमध्ये निवड समिती वेगवेगळ्या सामन्यांवर नजर ठेवून असतील. कारण पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे खेळाडूंची कामगिरी कशी आहे याकडे लक्ष असेल. रिपोर्टनुसार, निवड समितीने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी जवळपास 20 खेळाडूंची यादी तयार केली आहे. आता त्यांची कामगिरी कशी होते यावरून पुढची पावलं उचलली जातील. इतकंच काय तर एखाद्या नवख्या खेळाडूने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली तरी त्याचा विचार वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी केला जाणार नाही. त्यामुळे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी या फॉर्मेट खेळणाऱ्या खेळाडूंची नावं असणार आहेत. म्हणजेच वैभव सूर्यवंशी खोऱ्याने धावा केल्या तरी त्याचा विचार केला जाणार नाही.
वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात कधी एन्ट्री मिळणार?
वैभव सूर्यवंशी टीम इंडियाकडून कधी खेळणार? याची उत्सुकता आहे. नुकताच टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे वनडे नाही तर टी20 संघात तरी स्थान मिळेल का? असा प्रश्न आहे. आता टी20 वर्ल्डकप थेट दोन वर्षांनी आहे. त्यात यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतील 70 टक्के संघ पुढच्या वर्ल्डकप पर्यंत कायम असेल असं चित्र आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी कधी खेळणार? तर त्याला एशियन्स गेम्समध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण एशियन गेम्स मधील स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये खेळली जाते.
