
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कालच्या सेमी फायनलमध्ये भारताने विजय मिळवत फायनलमध्ये थाटात प्रवेश केला. इंग्लंडला 7 धावांनी हरवत भारत जिंकला आणि आता फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना न्.ुझीलंडशी होणार आहे. 8 मार्च रोजी होणाऱ्या या सामन्याकडे प्रत्येक क्रिकेट प्रेमीचं लक्ष लागलं आहे. दरम्यान कालच्या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्याचा टर्निंग पॉईंट कोणता ते सांगत एका खास व्यक्तीला या विजयाचं श्रेय दिलं. भारतात वर्ल्डकप खेळणं आणि संघाचे नेतृत्व करणे ही खूप खास भावना आहे. विशेषतः जेव्हा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे, तेव्हा तो खूप महत्वाचा ठरतो.
“ही एक अविश्वसनीय भावना आहे. भारतात खेळणं, इतक्या उत्तम संघाचं नेतृत्व करणं आणि इथे वर्ल्डकपमध्ये खेळणं हे खूपच खास आहे. आता, अंतिम सामना खेळण्यासाठी अहमदाबादला जाणं हा आम्हा सर्व खेळाडूंसाठी एक अतिशय खास क्षण आहे.” असं तो मम्हणाला. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान कालचा सामना कुठे फिरला, त्याबद्दलही सूर्या स्पष्टच बोलला.
सॅमसनच्या शानदार खेळीबद्दल काय म्हणाला कर्णधार ?
कालच्या सामन्यात शानदार फलंदाजी कामगिरीबद्दल सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनचंही कौतुक केलं. मैदानावर पाऊल ठेवताच काय करायचं आहे ते सॅमसनला नेमकं कळलं होतं, असं तो म्हणाला. तो फलंदाजीसाठी बाहेर पडताच, त्याला काय करायचे आहे हे माहित होते. विकेट चांगली होती, म्हणून जेव्हा जेव्हा विकेट पडली, तेव्हा त्याने आक्रमकता कायम ठेवली. संघाला आवश्यक असलेल्या पद्धतीने त्याने अगदी बरोबर फलंदाजी केली. गेल्या वर्षभरात त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे आज फळ मिळाले अशा शब्दांत सूर्याने संजूचं कौतुक केलं.
कोणी पलटली मॅच ?
कालच्या सामन्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केलं आणि तिथून सामना भारताच्या बाजूने झुकला, असं सूर्याने मान्य केलं. “जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि इतर गोलंदाजांनी ज्या पद्धतीने सामना परत खेचून आणला, ते अविश्वसनीय होतं. बुमराह गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी काय करत आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याने आजही तेच केले आणि विजय दूर जाऊ दिला नाही, अशा शब्दातं कॅप्टननने बुमराहवर स्तुतीसुमनं उधळली. 18 व्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त 6 धावा दिल्या. एवढंच नव्हे तर अक्षर पटेलने पकडलेला कॅच आणि हार्दिकची 19 वी ओव्हर देखील निर्णायक ठरली,त्यात फक्त 9 धावा दिल्या.
इंग्लंडने केलेला धावांचा पाठलाग खूपच रोमांचक झाला. मॅचनंतर सूर्याने मजेत सांगितलं की, त्याने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकला विचारलं होतं की त्यांना त्यांच्याविरुद्ध किती धावा काढायच्या आहेत. तो म्हणाला, “अरे देवा! मी हॅरी ब्रुकला सांगितलं, ‘तुझ्याविरुद्ध आम्हाला किती धावा कराव्या लागतील?’ असं मजेत सूर्याने सांगितलं. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, खेळपट्टी खूप चांगली होती. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचे सर्व श्रेय त्यालाच जाते. तो संपूर्ण सामन्यात स्पर्धेत टिकून होता.” असंही सूर्या म्हणाला.