पाकिस्तानचा धुव्वा, भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय
प्रोव्हिडन्स (गयाना) : भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकात सलग दुसरा विजय मिळवत पाकिस्तानच्या महिला संघावर सात विकेट्स राखून मात केली. मिताली राजच्या (56) शानदार अर्धशतकी खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. या विजयासोबतच भारताने ग्रुपमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 20 षटकांमध्ये 133 धावांचं लक्ष्य उभारलं. भारतीय गोलंदाजांसमोर […]
प्रोव्हिडन्स (गयाना) : भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकात सलग दुसरा विजय मिळवत पाकिस्तानच्या महिला संघावर सात विकेट्स राखून मात केली. मिताली राजच्या (56) शानदार अर्धशतकी खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. या विजयासोबतच भारताने ग्रुपमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 20 षटकांमध्ये 133 धावांचं लक्ष्य उभारलं. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाजांना तग धरता आला नाही. अरुंधती रेड्डीने सुरुवातीलाच भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
यानंतर उमैमा सुहेल आणि जावेरियासुद्धा लवकरच धावबाद होऊन माघारी परतल्या. 30 बाद 3 अशी परिस्थिती असताना बिस्माह आणि निदा यांनी 93 धावांची भागीदारी करत धावसंख्या 123 पर्यंत नेली. पण भारतीय महिला गोलंदाजांनी पाकिस्तानच्या या दोन्ही फलंदाजांना लवकरच आवर घातला.
भारताच्या डावाची सुरुवात 10 धावांपासून झाली. पाकिस्तानला धावपट्टीवरुन न पळण्यासाठी दोन-दोन वेळा सूचना देण्यात आली. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे पाकिस्तानला 10 धावांची पेनल्टी देण्यात आली. विजयासाठी 134 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताच्या मिताली राज आणि स्मृती मंधाना यांनी शानदार सुरुवात केली.
मिताली राज आणि स्मृती मंधानाने 9.3 षटकात 73 धावा करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण 10 व्या षटकात स्मृतीला पाकिस्तानच्या बिस्माहने बाद केलं. स्मृतीने 28 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या.
मिताली राजने जेमिमासोबत 100 धावांचा टप्पा गाठला. निदा दारने 15 व्या षटकात जेमिमाला बाद केलं. तिने 21 चेंडूत 16 धावा केल्या. नंतर मितालीने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत शानदार खेळी करत अर्धशतक पूर्ण केलं. पण डिआना बॅगने मितालीला बाद करत भारताला धक्का दिला. मितालीने 47 चेंडूत 7 चौकारांसह 56 धावा केल्या. शेवटी हरमनप्रीतने 13 चेंडूत 14 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.