धोनीला अखेरच्या दोन्ही वन डेतून वगळलं, माहीचा भारतातील शेवटचा सामना?
रांची: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात, कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज 123 धावानंतरही, भारताला 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला 314 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारताचा संघ 48.1 षटकात 281 धावांवर गडगडला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केलं आहे. सध्या भारत 2-1 ने आघाडीवर आहे. पुढील दोन वन डे […]
रांची: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात, कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज 123 धावानंतरही, भारताला 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला 314 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारताचा संघ 48.1 षटकात 281 धावांवर गडगडला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केलं आहे. सध्या भारत 2-1 ने आघाडीवर आहे.
पुढील दोन वन डे 10 आणि 13 मार्चला होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच भारतीय संघव्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुढील दोन्ही वन डे सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तिसऱ्या वन डेतील पराभवानंतर भारताचे सहप्रशिक्षक संजय बांगर यांनी याबाबतची माहिती दिली.
“आम्ही शेवटच्या दोन वन डेंसाठी संघात काही बदल करत आहोत. धोनी शेवटच्या दोन वन डे सामन्यात खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन वन डे सामन्यासांठी धोनीला विश्रांती देण्यात आली आहे”, अशी माहिती संजय बांगर यांनी दिली.
या मालिकेतील चौथा वन डे सामना 10 मार्चला मोहाली इथं तर पाचवा आणि शेवटचा वन डे सामना दिल्लीत खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही सामन्यात ऋषभ पंत विकेटकीपिंगची धुरा सांभाळेल.
Team India batting Coach Sanjay Bangar: MS Dhoni will not be playing the last two ODIs of the ongoing five-match series against Australia. He is going to take rest after this. pic.twitter.com/tkayIkPhDa
— ANI (@ANI) March 8, 2019
धोनीचा भारतातील शेवटचा सामना?
धोनीला शेवटच्या दोन वन डे सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली असली, तरी विश्वचषकाच्या तयारीसाठी, खबरदारी म्हणून संघव्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. धोनीचा सध्याचा फॉर्म तितकासा वाईट नाही. तरीही त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पण धोनीचा भारतातील हा शेवटचा आंतरराष्ट्रीय वन डे सामना ठरण्याची शक्यता आहे.
कारण यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत भारतीय संघ होमग्राऊंडवर एकही वन डे सामना खेळणार नाही. येत्या 23 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. त्यानंतर टीम इंडिया विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होईल. त्यावेळी धोनीचा भारतीय संघात समावेश असेल. मात्र त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत बाहेरील देशात वन डे मालिका होत असल्या, तरी भारतात मात्र एकही वन डे मालिका नाही.
वन डे विश्वचषकानंतर महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनीचा रांचीतील सामना भारतातील अखेरचा वन डे ठरण्याची शक्यता आहे.