महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादावर अखेर अध्यक्ष रामदास तडस यांनी मौन सोडलं, म्हणाले…
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने पटकावली. मात्र या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम फेरीला वादाची किनार लाभली. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे आणि अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड यांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर अखेर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस अखेर व्यक्त झाले आहेत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 स्पर्धा वादामुळे चांगलीच गाजली. संपूर्ण राज्यात कुस्तीच्या निकालावरून चर्चा सुरु आहे. नेमकं कोण चूक आणि कोण बरोबर असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीत पंचांनी चुकीचा निकाल दिल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना झाला. या सामन्यात पाठ टेकली नसल्याचा आरोप शिवराज राक्षेने केला. तसेच पंचांना लाथ मारली. त्यामुळे खूपच वाद रंगला. त्यानंतर अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला. पण या सामन्यातही अॅक्टिव्हिटी पिरियडवरून महेंद्र गायकवाडने आक्षेप घेतला आणि सामना सोडला. त्यामुळे या सामन्याची विजयाची गदा पृथ्वीराज मोहोळ याच्याकडे आली. स्पर्धा संपून आता दोन दिवसांचा काळ लोटला तरी चर्चा सुरु आहे. असं असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी भावना व्यक्त केली आहे.
पाच दिवसांच्या कुस्तीत अनेक कुस्तीपटूंचा उत्साह पाहायला मिळाला, असं सांगत रामदास तडस यांनी मुख्य मुद्द्याला हात घातला. शेवटच्या दिवशी उपांत्य फेरीचा सामना कुस्तीपटू शिवराज राक्षे आणि मोहोळ यांच्यात झाला.कुस्ती सुरू झाल्यानंतर तिसर्या मिनिटाला मोहोळ यांनी शिवराज राक्षेला खाली घेतला. पंचांनी मोहोळ जिंकल्याचा निकाल दिला. पंच, सरपंच आणि मॅच चेअरमन या तिघांची एकच बाजू असली तर ती खरी मानली जाते. तिघांनीही एकच निकाल दिला. पण शिवराज राक्षे यांनी संघटनेकडे दाद मागितली नाही. संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी तेथे होतो. सेक्रेटरी होते. पण याकडे न येता रेफरीकडे जावून शर्ट पकडले आणि त्यांना लाथ मारली, हे संयुक्तिक नव्हतं. त्यांना अन्याय झाला असे वाटत होते तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे दाद मागायला पाहिजे होती पण दाद मागितली नाही. एका चांगल्या खेळाडूने असे करण योग्य नाही. पूर्वीही कुस्त्या झाल्या त्यातही थोडेस वाद झाले होते. त्यावेळी पंच बरोबर होते यावेळी पंच बरोबर नव्हते असं बोलणं शोभणारी गोष्ट नाही, असं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी सांगितलं.
कुस्त्या संपल्यानंतर पंचांनी उपोषणाला सुरूवात केली. पण आम्ही पोलिसांत तक्रार केली नाही. शिवराज राक्षेला पंधरा दिवसांपूर्वी नोकरी लागली होती खेळाडूचे नुकसान होऊ नये, याकरिता तक्रार मागे घ्यायला लावली. मी स्वतः अध्यक्ष म्हणून त्यांचं तीन वर्षांकरिता निलंबन केलं, असं रामदास तडस म्हणाले.