IND vs SA :’पीच बदलण्याऐवजी आपल्या…’, हरल्यानंतर सौरव गांगुली हेड कोच गौतम गंभीरला जिव्हारी लागणारं बोलला
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. भारतीय संघाने काल जिंकायचा सामना गमावला. विजयासाठी फक्त 124 धावांचं टार्गेट होतं. अवघ्या तीन दिवसात हा कसोटी सामना निकाली निघाला. घरच्या मैदानात हरल्यानंतर सौरव गांगुलीने हेड कोच गौतम गंभीरला काही सल्ले दिले आहेत.

Sourav Ganguly vs Gautam Gambhir : कोलकाता टेस्टमध्ये काल टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने हरवलं. आपण सहज जिंकू असं वाटत असताना हा पराभव झाला. या पराभवानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्पिन गोलंदाजी आता टीम इंडियाची ताकद राहिलेली नाही का?. भारताने आता स्पिनिंग ट्रॅक बनवणं बंद केलं पाहिजे का?. अवघ्या 3 दिवसात कोलकाता टेस्ट मॅच संपली. भारताचा 30 धावांनी पराभव झाला. आता ईडन गार्डन्सच्या पीचवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. क्रिकेट असोशिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पीचवरुन सुरु असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यांनी भारतीय टीमला मोलाचा सल्ला दिला आहे.
भारतीय टीमने डिमांड केलेली तशीच ईडन गार्डन्सची विकेट होती. गांगुली त्यापुढे जे बोलला, ते जास्त विचार करायला लावणारं आहे. भारतीय टीम मॅनेजमेंटने घरच्या मैदानावर दबदबा राखण्यासाठी पीचशी छेडछाड करणं बंद केलं पाहिजे असं गांगुली म्हणाला. भारताचा माजी कर्णधार आणि CAB चा अध्यक्ष सौरव गांगुली याच्यानुसार, पीच असा हवा जिथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी काहीतरी असलं पाहिजे. म्हणजे त्या पीचवर 350 पेक्षा जास्त धावा सुद्धा झाल्या पाहिजेत आणि गोलंदाजांना विकेट काढण्यासाठी सुद्धा प्रेरणा मिळेल.
तो खुश नाहीय
सौरव गांगुली म्हणाला की, ‘अपेक्षा आहे की गौतम गंभीर मी जे बोलतोय ते ऐकत असेल’ त्यांनी गंभीरला सल्ला दिला की, ‘पीच बदलण्याऐवजी आपल्या बॉलिंग क्षमतेवर विश्वास दाखव’ टीममध्ये बुमराह आणि सिराज आहेत, ते चांगली गोलंदाजी करतायत. पण गांगुलीच्या मते शमी सुद्धा या टीममध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये भारताला मॅच जिंकवून देण्याची क्षमता आहे. सौरव गांगुलीच्या या स्टेटमेंटवरुन हे स्पष्ट होतं की, टेस्टसाठी टीम इंडियाकडून होणाऱ्या स्पेशल पीचच्या मागणीवर तो खुश नाहीय.
त्याची किंमत चुकवावी लागलेली
कोलकाता टेस्ट मॅचनंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना गौतम गंभीरने पीच बद्दल स्टेटमेंट केलं. “जशी हवी होती, तशीच विकेट मिळाली. क्यूरेटरची खूप मदत झाली. तुम्ही चांगले खेळला नाहीत, तर हरणार हे मान्य केलं. 124 चेज करण्यासारखा स्कोर होता. पीचमध्ये काही गडबड नव्हती” असं गौतम गंभीर म्हणाला. गौतम गंभीरने आपल्या निर्णयाचा कितीही बचाव करुं दे. पण सत्य लपत नाही. 2024 साली न्यूझीलंड विरुद्ध सीरीजमध्ये सुद्धा असच झालेलं. भारतीय टीमने स्पिन पीचची डिमांड केलेली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागलेली.
