
T20 World Cup 2026 Semifinals Rules : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आता आर या पार अशी लढाई सुरू होणार आहे. ज्याला नॉकआऊट स्टेज असंही म्हटलं जातं. या स्टेजला येऊन जर पराभव झाला तर वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न चक्काचूर होऊ शकतं. उद्या म्हणजेच 4 मार्टपासून सेमीफायनलचे सामने सुरू होणार आहेत, आणि फॅन्सचा उत्साह, त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सेमीफायनलची पहिली मॅच ही दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होईल, उद्या म्हणजेच 4 मार्च रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होणार आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना हा टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड असा होणार आहे. 5 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील.या दोन्ही सामन्यांत जो सघ विजयी होईल तो थेट सेमीफायनलमध्ये पोहोचेल, पराभूत संघाला मात्र गाशा गुंडाळावा लागेल.
असं झाल्यास एकाच दिवशी होतील दोन्ही सेमीफायनल
नॉकआउट सामन्यांसाठी आयसीसीचे विशिष्ट नियम आहेत, ज्यामुळे दोन्ही सामने एकाच दिवशी खेळवले जाऊ शकतात. खरं तर, पाऊस किंवा खराब हवामानामुळे सामन्यांची मजा खराब होऊ नये म्हणून, आयसीसीने दोन्ही सेमी फायनल सामन्यांसाठी राखीव दिवस निश्चित केले आहेत. जर 4 मार्च रोजी पावसामुळे पहिला सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो 5 मार्च रोजी खेळवला जाईल. त्याचप्रमाणे, जर 5 मार्च रोजी होणारा दुसरा सामना पावसामुळे किंव अन्य कारणांमुळे खेळला गेला नाही तर तो दुसऱ्या दिवशी हलवला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे, जर पहिला उपांत्य सामना राखीव दिवशी खेळवला गेला तर दोन्ही उपांत्य सामने एकाच दिवशी, म्हणजे 5 मार्च रोजी होऊ शकतात. स्पर्धेच्या शेड्यूलमध्ये मोठा व्यत्यय येऊ नये आणि अंतिम तारखेवर परिणाम होऊ नये यासाठी आयसीसीने हा नियम लागू केला आहे. मात्र, जर दोन्ही उपांत्य सामने एकाच दिवशी झाले, तर सामन्यांच्या वेळा वेगवेगळ्या असतील. नियमांनुसार, राखीव दिवशीचे सामने दुपारी 3 वाजता सुरू होतील. यामुळे दोन्ही सामन्यांमधील संघर्ष टाळता येईल, आणि चाहत्यांना दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांचा पूर्णपणे आनंद घेता येईल. मॅचच्या दिवशी अतिरिक्त वेळेची देखील परवानगी आहे, मात्र निकाल काढता यावा यासाठी रिझर्व्ह डे च्या दिवशी अधिक लवचिकता असते.
कोणत्याही परिस्थितीत लागणार निकाल
हवामानामुळे नॉकआऊट फेरीतील सामने प्रतिकूल होऊ नयेत यासाठी हा नियम तयार करण्यात आला होता. अंतिम सामना देखील अशाच नियमांनुसार होईल, परंतु सध्या सर्वांच लक्ष हे सेमीफायनल मॅचवर आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी हा एक रोमांचक काळ आहे, कारण त्यांचा सामना घरच्या मैदानावर इंग्लंडशी होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातही चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. या सामन्यांमधील विजेते संघ 8 मार्च रोजी ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.