
T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाने पाकला पुन्हा हरवल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाकमध्ये सगळेच शोकाकूल झाले आहेत. भारताला नमवण्याची वल्गना करणारा पाकिस्तानी संघ धाडकन तोंडावर आपटला आणि त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. पाकिस्तानला 61 धावांनी हरवल्यामुळे टीम इंडियाच्या गोटात आनंदाच वातावरण आहे. त्यातच आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे. भारताने फक्त पाकला नमवलं नाहीये तर त्यांना डबल फायदा झाला आहे. त्याच फायद्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला आहे. पण तो वर्ल्ड रेकॉर्ड नेमका आहे तरी काय ? असाच सवाल सर्वांच्या मनात आहे. कोलंबोमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाला आणखी कोणते फायदे मिळाले? चला जाणून घेऊया.
भारताचा पाकिस्तानवर विक्रमी विजय
काल म्हणजेच रविवार 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कप2026 च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विक्रमी विजय मिळवला. पाकला भारताने 61 धावांनी हरवलं, जो T20 वर्ल्डकपमध्ये धावांच्या बाबतीत पाकिस्तानवर भारताचा सर्वात मोठा विजय होता. T20 वर्ल्ड कपमध्ये धावांच्या बाबतीत पाकिस्तानचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव होता.
पाकिस्तानला हरवण्याचा पहिला फायदा- सुपर-8 मध्ये प्रवेश
आता, या मोठ्या विजयाचा पहिला फायदा म्हणजे टीम इंडियाला सुपर 8 मध्ये स्थान मिळवणे. पाकिस्तानला हरवल्यानंतर,भारतीय संघ 2026 वर्ल्डकप्चाय सुपर8 मध्ये पोहोचला आणि ही कामगिरी करणारा वेस्ट इंडिजनंतर दुसरा संघ बनला.
पाकिस्तानला हरवून भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम
याशिवाय, पाकिस्तानवरील विजयाचा भारतीय संघाला झालेला दुसरा फायदा म्हणजे भारत, ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम मोडण्यात यशस्वी झाला. आयसीसी स्पर्धेत सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियन संघाने 19 वर्षांपूर्वी केला होता. 2006 ते 2007 दरम्यान ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धांमध्ये सलग 15 सामने जिंकले होते, हा विक्रम आता भारतीय संघाने मोडला आहे. पाकिस्तानविरुद्धचा टीम इंडियाचा विजय हा आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांचा सलग 16 वा विजय आहे. भारताने हे विजय 2024 ते 2026 दरम्यान मिळवले. ऑस्ट्रेलियाने आपला विश्वविक्रम सुधारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 2023 ते 2024 दरम्यान आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांना सलग फक्त 14 सामने जिंकता आले.