
आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पाणउतारा केला आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत वि. पाकिस्तान असा झालेला सामना पाक क्रिकेकप्रेमींसाठी एक दुस्वप्न ठरलं आहे, सगळ्यानंच ते विसरायची इच्छा आहे, पण दुर्दैवाने ते शक्य नाही. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये रविवारी रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवलं आणि 61 धावांनी शानदार विजय मिळवला. 176 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघाचा खेळ 114 धावांवरच आटोपला आणि भारताने सुपर-8मध्ये शानदार पद्धतीने धडक मारली.
भारताकडून हा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर, पाकिस्तानमध्ये दु:खाचं वातावरण असून पाकचा माजी खेळाडू, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा तर अगदी तिळपापड झाल्याचं पहायला मिळालं. शोएब अख्तरने पराभवानंतर थयथयाट केलाच पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावरही जोरदार टीका केली.
शोएब अख्तरने मोहसीन नक्वींची इज्जतच काढली
पाकच्या पराभवानंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शोएब अख्तर स्पष्टच बोलला. क्रिकेट माहित नसलेली व्यक्ती पीसीबीचा अध्यक्ष आहे, त्यामुळेच पाकिस्तान संघासोबत हे घडत असल्याचं त्याने नमूद केला. ” एक माणूस ज्याला काही येत नाही, काही माहीत नाही, तो पाकि्तान क्रिकेट बोर्डाचा चेअरमन ( मोहसीन नक्वी) बनला आहे. तुम्ही काय करू शकता ? अशाने संघ कसा चालणार ? तुम्ही एका खेळाडूला (बाबर आझम) सुपरस्टार बनवलं आहे, पण तो तुम्हाला एकही सामना जिंकून देऊ शकत नाही ” अशा शब्दांत शोएब अख्तरने मनातली सगळी भडास बाहेर काढली. त्याचा रोख स्पष्टपणे नक्वी आणि बाबार आझम कडे होता.
तो एवढ्यावरच थांबला नाही, पुढे तो म्हणाला, ‘ जेव्हा अशा लोकांना स्टार बनवलं जातं, त्यांची निवड केली जाते तेव्हा प्रॉब्लेम तर येणारच. पण जगातला सगळ्यात मोठा गुन्हा काय माहीत आहे का ? जगातला सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे एखाद्या अयोग्य आणि अकार्यक्षम व्यक्तीला काम देणं. जेव्हा तुम्ही एखाद्या अयोग्य आणि अज्ञानी व्यक्तीला कामावर ठेवता तेव्हा ते तुमचा देश उद्ध्वस्त करतात. ते कोणत्याही संघटनेला पाडू शकतात. उदाहरणं तुमच्या समोर आहेत. तुम्ही हे समजून घेण्याइतके हुशार आहात.” असं म्हणत त्याने पराभवानंतर नक्वींवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
पाकचा नामिबियाशी सामना
रविवारी भारताकडून हार मिळाल्यानंतर पाकिस्तान आता ग्रुप ए पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्यावरती अमेरिकेचा संघ आहे. दोन्ही संघाचे 4-4 पॉईंट्स आहेत. पाकिस्तानचा शेवटचा ग्रुप स्टेजचा सामना नामिबियाविरुद्ध असेल. सुपर 8 मध्ये धडक मारण्यासाठी त्यांना नामिबियाला हरवावंच लागेल.
भारताचा शानदार विजय
भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध एकूण नऊ सामने खेळले आहेत, त्यापैकी आठ सामने भारताने जिंकलेत. यापैकी एक सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. तर, पाकिस्तानने 2021 साली मध्ये भारताविरुद्धचा एकमेव टी20 वर्ल्डकप मॅच जिंकली आहे. काल पाकने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर पहिले फलंदाजी करताना भारताने 7 विकेट गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियाकडून इशान किशनने 40 चेंडूत सर्वाधिक 77 धावा केल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 25 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी संघाचा खेळ 18 षटकांत फक्त 114 धावांवर आटोपला. पापकडून उस्मान खानने सर्वाधिक 44 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने नाबाद 23 धावांचे योगदान दिले.