IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्ध सहाव्या बॉलरचा नाद करु नका, भारताच्या मोठ्या खेळाडूचा सूर्या-गंभीरला मोलाचा सल्ला
IND vs WI : उद्या टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 राऊंडमध्ये टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर काहीही करुन ही मॅच जिंकावीच लागेल. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात आता काही प्रयोग करुन चालणार नाही.

उद्या 1 फेब्रुवारी टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 राऊंडमधील भारतीय क्रिकेट संघाचा हा तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 72 धावांनी विजय मिळवला. आता वेस्ट इंडिज विरुद्ध सामना करो या मरो आहे. क्वार्टरफायनलच म्हणा. हरणारी टीम थेट बाहेर जाईल. त्यामुळे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला उद्या वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकावचं लागेल. भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी या मॅचमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाला काही मोलाचे सल्ले दिले आहेत.
श्रीकांत यांनी पार्ट टाइम गोलंदाज म्हणून शिवम दुबेचा वापर करण्यावर टीका केली. झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात शिवम दुबेने 2 ओव्हरमध्ये 46 धावा दिल्या होत्या. सहावा गोलंदाज म्हणून जेव्हा, जेव्हा शिवम दुबेच्या हाती सूर्यकुमार यादवने चेंडू दिलाय, तेव्हा तो महागडाच ठरलाय. झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात सुदैवाने टार्गेट मोठं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या वेस्ट इंडिजवरील विजयामुळे नेट रनरेटच महत्व उरलं नव्हतं. अन्यथा शिवम दुबेच्या दोन ओव्हर खूप महागड्या ठरल्या असत्या. शिवम दुबे मध्यमगती गोलंदाज आहे. झिम्बाब्वे विरुद्ध गोलंदाजी करताना त्याला दिशा आणि टप्पा यासाठी संघर्ष करावा लागत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने गोलंदाजी केली, त्यावेळी सुद्धा काही वेगळी स्थिती नव्हती. झिम्बाब्वे विरुद्ध त्याने चार वाइड बॉल आणि काही नो-बॉल टाकले.
सहाव्या स्टम्पवर तो चेंडू टाकत होता
भारताचे माजी ओपनर कृष्णमचारी श्रीकांत यांनी शिवम दुबेच्या दिशाहिन गोलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली. शिवम दुबेचं गोलंदाजी करताना कसं नियंत्रण नव्हतं, ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉलिंग करत होता याकडे श्रीकांत यांनी लक्ष वेधलं. “बॉलिंग हा माझ्यासाठी चिंतेचा विषय नाही. तो चांगला बॅटिंग ट्रॅक होता. सहावा गोलंदाज हाच फक्त माझ्या चिंतेचा विषय आहे. दुबे कुठे बॉलिंग करत होता, हे तुम्ही पाहिलं का?. सहाव्या स्टम्पवर तो चेंडू टाकत होता. मी अशी गोलंदाजी पाहिलेली नाही” असं श्रीकांत ‘चिकी चीका’वर बोलले.
श्रीकांत याचा सल्ला काय?
“दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरल्यानंतरही मी म्हटलं होतं की, टीम इंडिया चेन्नईत जिंकेल. पुन्हा एकदा कप जिंकण्याच्या मार्गावर निघेल. अर्शदीप, बुमराह चांगली बॉलिंग करतायत. वरुण आणि हार्दिकचा परफॉर्मन्स डिसेंट आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध तुम्हाला सहाव्या गोलंदाजाचा वापर करण्याची आवश्यकता नाही” असं श्रीकांत यांनी म्हटलं आहे.
