T20 World Cup 2026 : टीम इंडियातील एका खेळाडूचं नशीब जोरात, सूर्या, गंभीर यांनी त्याला सांगून ठेवलय तू फक्त…
T20 World Cup 2026 : टीम इंडिया उद्या वेस्ट इंडिज विरुद्ध सुपर-8 राऊंडमधील तिसरा सामना खेळणार आहे. हा सामना करो या मरो आहे. एकप्रकारे क्वार्टर फायनलच म्हणा. कारण दोन्ही टीम्समधून जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे.

टीम इंडियातील एका खेळाडूच नशीब जोरात आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि हेड कोच गौतम गंभीर यांनी त्याला सांगून ठेवलय की आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हा प्लेयर दुसरा-तिसरा कोणी नसून टीम इंडियाचा घातक ओपनर अभिषेक शर्मा आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 च्या झिम्बाब्वे विरुद्ध दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माला अखेर सूर गवसला. सलग तीनवेळा शुन्यावर आऊट झाल्यानंतर अभिषेकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 धावा केल्या. त्यानंतर झिम्बाब्वे विरूद्धच्या करो या मरो मॅचमध्ये अभिषेक शर्माची बॅट तळपली. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्याशिवाय टी20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या पहिल्या हाफ सेंच्युरीची नोंद केली. 30 चेंडूत त्याने 55 धावा तडकावल्या. या खेळीत त्याने चार सिक्स आणि चार फोर मारले. त्यामुळेच टीम इंडियाला या सामन्यात 4 बाद 256 धावांचा डोंगर उभा करता आला.
अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये परतल्यानंतर कठीण काळात संघ सहकाऱ्यांकडून मिळालेला सपोर्ट, इतरांनी कसा विश्वास दाखवला त्या बद्दल बोलला. “नक्कीच मला दिलासा मिळालाय. पण मी टीम सोबत जे दिवस घालवले त्यात माझ्या लक्षात आलं की, त्यांचा माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. त्यामुळे मी भावनिक सुद्धा झालो. मी चांगला खेळत नव्हतो. मी माझ्यापरीने प्रयत्न करत होतो. पण माझ्याकडून प्रदर्शन होत नव्हतं. पण संघातील सहकारी, कोचेस यांचे मी चांगली कामगिरी करावी हेच प्रयत्न होते, इच्छा होती. ही एक चांगली गोष्ट आहे, खूप चांगली भावना आहे, जी मला मागच्या काही दिवसात जाणवली” असं अभिषेक बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बोलला.
तू टीमला मॅच जिंकवून देणार
सुरुवातीला जे अपयश आलं ते पचवणं खूप जड होतं, खासकरुन वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्टेजवर. त्याने कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि हेड कोच गौतम गंभीर यांना पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं श्रेय दिलं. “मी शुन्यावर आऊट होत होतो. पण त्यांची पाठराखण आणि त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास टिकून राहिला” असं अभिषेकने सांगितलं. “वर्ल्ड कपची सुरुवात माझ्यासाठी जशी हवी तशी झाली नाही. सर्व सहकाऱ्यांनी मला प्रेम आणि विश्वास दिला. खासकरुन कोच आणि कॅप्टनने. तू अजून एकदा शुन्यावर आऊट झालास हरकत नाही, कदाचित लवकर आऊट होशील. पण तू सर्व सामने खेळणार. तू टीमला मॅच जिंकवून देणार. मला वाटतं खेळाडू म्हणून असं पाठिशी उभं राहणं महत्वाचं आहे” असं अभिषेक शर्मा म्हणाला.
