मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करुन खळबळ उडवून दिलीय. एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीची पोलखोल केलीय. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहिल्याची माहिती मिळतेय. ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातं आहे, असा आरोप वानखेडे यांनी या पत्रात केलाय. त्याचबरोबर माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी मागणीही वानखेडे यांनी केली आहे.