राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा दायक बातमी आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आता 12 तास वीज देणार असल्याची घोषणा केली. ते अकोला दौऱ्यावर असताना ही घोषणा केली. तर महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली. दरम्यान सोलापूरला पावसाने झोडपले आहे. सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला आहे. तर सततच्या पावसामुळे रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झालं आहे. यादरम्यान भर पावसात रस्त्याचं काम सुरू असल्याची घटना सांगली जिल्ह्यात समोर आली आहे. यानंतर संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होमगार्ड प्रशिक्षण कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.