Ambadas Danve । शिंदे गटाकडे फक्त पैसा, विचार नाही!; ऑपरेशन टायगरवरून अंबादास दानवेंचा घणाघात
राज्यात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
राज्यात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले की, “शिंदे गटाकडे पैसा सोडला तर कोणताही विचार नाही, संघटना नाही. त्यांच्याकडे फक्त पैसा आहे, हे त्यांनी मान्य केले पाहिजे.”
तसेच त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सरकार सामान्य लोकांवर आणि विविध प्रकरणांमध्ये ईडीच्या धाडी टाकते. मात्र इथे कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याच्या चर्चा आहेत. अशा प्रकरणांकडे ना ईडी लक्ष देते, ना आयकर विभाग, ना सीबीआय. ही आपल्या देशातील सध्याची परिस्थिती आहे,” असा आरोप दानवे यांनी केला.
ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांवर बोलताना त्यांनी या दाव्यांना फारसे महत्त्व नसल्याचे सांगितले. “काल आणि परवा बहुसंख्य खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. ते बैठकीलाही उपस्थित होते. त्यामुळे रोज कुणी जाणार, कुणी राहणार अशा चर्चा होत असतात. एखाद्याने पक्ष सोडला म्हणून सर्वच लोक पक्ष सोडतील, असे नाही,” असे दानवे म्हणाले.
दरम्यान, राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार मिळाली आहे. ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान त्यांच्या या प्रतिक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
