मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात कॅगचा अहवाल सादर केला. मुंबई महापालिकेत तब्बल १२ हजार कोटी रुपयांच्या कामाचे कॅगकडून ऑडिट करण्यात आले आहे. विशेषतः कोरोना काळातील निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका या अहवालातून ठेवण्यात आला आहे. इतकेच नाही तर अहवालात पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप आमदारांनी आता ठाकरे गटावर गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे. या देशात चोराला चोर म्हणणं गुन्हा आहे, असं काल कुणीतरी म्हणालं होतं. पण कॅग अहवालाच्या माध्यमातून मुंबईचा खरा चोर, डाकू, खरा लुटणारा कोण आहे हे कळालं. मुंबईचा कोपरा न् कोपरा विकून खाल्ला, यांना चोर नाही डाकू म्हणावं, अशी टीका भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.