मुंबई: आम्ही गेल्या 26 महिन्यांपासून सत्तेच्या बाहेर आहोत. पण आज झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून सत्ताधारी नव्हे तर आम्हीच राज्यात नंबर वन आहोत हे सिद्ध झालं आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले. राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असं पाटील यांनी सांगितलं. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी आणि सुनील कर्जतकर उपस्थित होते.