छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
तेलंगणामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी भुजबळांनी केली आहे. महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरील हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरच घाला असल्याचे भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. काही समाजकंटकांकडून महात्मा फुले यांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरील हल्ला हा केवळ एका पुतळ्यावरचा हल्ला नसून, तो त्यांच्या संपूर्ण विचारांवर आणि सामाजिक समतेवर केलेला घाला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणात जातीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे.
