कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी कोरोना लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे लसीकरण मोहीम अधिक प्रभावी होताना दिसत नाही. अशावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुण्यात जास्त कोरोना आहे, इथं लस द्या असं केंद्र सरकारला सांगितलं, पत्रही लिहिलं, पण मोदी सरकार त्याचं उत्तरच देत नाही, अशी प्रतिक्रिया सायरस पुनावाला यांनी दिली आहे. सायरस पुनावाला यांच्या या वक्तव्यामुळे लसीकरणावरुन राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं जोरदार राजकारण रंगण्याची चर्चा आहे.