नागपूर: राज्याच्या गृहखात्याने मुंबई-ठाण्यातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या. त्यानंतर लगेचच आज सकाळी या बदल्यांना स्थगिती दिली आहे. त्यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. या बदली प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारने रात्री पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून सकाळी त्याला स्थगिती दिल्याच्या प्रकरणावरून वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विदर्भ दौऱ्यावरही टीका केली आहे. विदर्भातील (vidarbha) माती आणि वातावरण चांगलं आहे. त्याचा गुण राऊतांना लागेल. त्यांनी वारंवार विदर्भात यावं, त्यांना सुबुद्धी सूचेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.