राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या विषयावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. राज्यसभेसाठी भाजपने अनिल बोंडे यांना उमेदवारी दिल्याने संजय राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर बोलताना गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. मागच्या काळात शिवसेनेने निष्ठावानांना उमेदवारी का दिली नाही, असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी राजकुमार धूत, ब्रिटिश नंदी, प्रियंका चतुर्वेदी यांची नावे घेत शिवसेनेला स्थानिक आणि निष्ठावानांची आठवण करून दिली. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील, कारण आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल, असा दावाही त्यांनी केला.