जळगाव : ‘भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी. भाजपने (BJP) डाव साधलाय. महत्वाची खाती आपल्याकडे ठेवलीत आणि शिंदेगटाला कमी महत्वाची खाती दिली”, असं टिकास्त्र सामनातून शिंदे गटावर डागण्यात आलं. त्यावर गुलाबराव पाटलांनी पलटवार केलाय. सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, असं राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले आहेत. ‘खातं कुणाला कोणतं आलं, त्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी सरकारची असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे,’ असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.