शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गेले दोन दिवस केंद्रीय नारायण राणे आणि भाजपवर सडकून टीका केली. आज त्यांनी आपला मोर्चा वळवलाय, तो ईडी आणि सीबीआयकडे… आजच्या सामना अग्रलेखात त्यांनी तपास यंत्रणांवर काही गंभीर आरोप केले आहेत. तसंच सर्वसामान्यांना वाटणारे काही सवाल अग्रलेखातून उपस्थित केले आहेत.
जेथे भारतीय जनता पक्षाचे राज्य नाही त्या राज्यांत ईडी अधिक सक्रिय होत आहे. शिवसेनेचे प्रताप सरनाईक असतील किंवा एकनाथ खडसे. त्यांच्याबाबतची प्रकरणे ईडी जितकी गांभीर्याने घेत आहे तितकी इतरांची का घेत नाही?, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधातही ईडीकडे शेकडो कोटींचा अपहार केल्याची तक्रार आहे, त्यांच्या संपत्तीवर कब्जा केल्याचं दिसलं नाही, मग हा फक्त योगायोग समजावा?, असा खडा सवाल राऊत यांनी विचारला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले आहेत. ‘सीबीआय हा सरकारी पिंजऱ्यातला पोपट आहे,’ असे न्यायालयाने आधीच जाहीर केले होते. आता ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’च्या चारित्र्यावरही शंका व्यक्त केली आहे. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होतोय. या संस्था व यंत्रणा सरकारच्या ‘अंगवस्त्र’ बनण्यास तयार आहेत व अनेकदा त्यांनी तसे कृतीतून दाखवूनच दिले आहे. त्यामुळे सीबीआय, ईडीवर न्यायालयाने मारलेले ताशेरे एक प्रकारे लोकभावनाच आहे.