मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याआधीही राज ठाकरे यांना 2008 साली रात्री 2.30 वाजता अटक झाली होती. मुंबई पोलिसांनी रत्नागिरीतून राज ठाकरे यांना अटक केली होती. 2008 च्या सुरवातीला रेल्वे जागा भरतीची जाहिरात निघाली होती. या परीक्षेला उत्तर प्रदेशातून रेल्वे परीक्षेसाठी हजारो तरुण मुंबईत आले. परंतु परीक्षा मुंबईत होती, रिक्त जागाही मुंबईतल्याच होत्या. परंतु इथल्या भूमीपुत्रांना डावलण्यात आलं. हे कळताच मनसेचे कार्यकर्ते परिक्षेआधीच रेल्वे स्थानकावर उत्तर भारतीय परिक्षार्थींवर तुटून पडले. मनसे बहुतेक परिक्षा केंद्रच उधळून लावले होते. मनसे इतके मोठे आंदोलन छेडू शकते याचा अंदाज सरकारला आला नाही. मनसेच्या आंदोलनाची देशभर चर्चा झाली. राज ठाकरेंवर चिथावणीचे आरोप झाले. राज ठाकरेंच्या अटकेची मागणी संसदेत होऊ लागली आणि अखेर राज ठाकरेंच्या अटकेचे फर्मान निघाले. तेव्हा राज ठाकरे रत्नागिरीतील सरकारी विश्रामगृहात होते. मुंबई पोलिसांनी येथून राज ठाकरेंना रात्री अडीचच्या सुमारास अटक केली.