मुंबईः पंचायत समितीच्या निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अनेक ठिकाणी बरेच नेते व्यक्तीगत पातळीवर लढत होते. काही ठिकाणी आम्ही शिवसेनेसोबत आघाडी केली. एकंदरीत निकाल पाहिला तर बऱ्याच ठिकाणी भाजपला लोकांनी नाकारलं आहे. मुख्यमंत्र्यांबाबत भाजपने जी भाषा वापरली, ती लोकांनी नाकारल्याचं चित्र आहे. अजून 23 नगरपंचायतींचे निकाल बाकी आहेत. त्याचबरोबर महापालिका आणि नगरपालिकांचे निकालही बाकी आहेत. पुढील निवडणुका महत्त्वाच्या आहेत. आमचे तरुण नेत्यांनी चांगली कामगिरी केली आहे. काही महत्त्वाच्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे अपेक्षित निकाल आला नाही, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.