शरद पवार यांचा अचानक अजितदादांना फोन, नेमकं घडलं काय? काय झाली चर्चा?
रविवारी पुरंदरमधील शेतकऱ्यांनी आपल्या काही प्रश्नांसाठी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा असं म्हटल्याचे पाहायला मिळाले.
राजकीय वर्तुळातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी फोन केला होता. पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शरद पवारांनी अजित पवार यांना फोन केल्याची माहिती मिळतेय. पुरंदरमधील शेतकरी शरद पवारांच्या भेटीला आले होते, त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन केला. पुरंदर विमानतळासंदर्भात शेतकऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावा, यासह शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, त्यासंदर्भात बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावा, असं शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करून सांगितल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, मात्र ते एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये असल्यानं शरद पवार यांचं त्यांच्याशी बोलणं झालं नाही, त्यानंतर शरद पवार यांनी लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला, अशी माहिती मिळतेय.