मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी भाजप-राष्ट्रवादीची युती होणार होती. पण शिवसेनेला तिसरा पक्ष नको होता. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो नाही, असं विधान करून खळबळ उडवून दिली. शेलार यांनी जुन्या खपल्या काढल्याने त्यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी तर राष्ट्रवादीसोबत युती न करण्याचा निर्णय ही आमची चूक होती, असं म्हणून शिवसेनेला डिवचले आहेत. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनीही त्यावर प्रतिक्रिया देताना बंद दाराआडचं राजकारणच बाहेर आणलं. विशेष म्हमजे ते त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या काळात घडलेल्या गोष्टीच बाहेर आणल्या. त्यावेळी राष्ट्रवादी आणि आमची चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीने अचानक चर्चेतून माघार घेतली. केवळ भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार असावं असं राष्ट्रवादीचं म्हणणं होतं. त्यांना शिवसेना युतीत नको होती, असा गौप्यस्फोटच रावसाहेब दानवे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.