Dattatray Bharne : सरळ काम सगळेच करतात, पण वाकडं काम करून… नव्या कृषीमंत्र्याचंही वादग्रस्त वक्तव्य अन्…

Dattatray Bharne : सरळ काम सगळेच करतात, पण वाकडं काम करून… नव्या कृषीमंत्र्याचंही वादग्रस्त वक्तव्य अन्…

| Updated on: Aug 02, 2025 | 10:51 AM

महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच गुरूवारी रात्री उशिरा दत्तात्रय भरणे आणि कोकाटेंच्या मंत्रिपदाची अदलाबदली झाली. आता भरणे राज्याचे कृषीमंत्री असून कोकाटेंकडे क्रिडा खाते गेले आहे.

कारखान्याचे संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात, असं राज्याचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. इतकंच नाहीतर एखादं वाकडं काम करून पुन्हा नियमात बसवतो त्याची माणसं नोंद ठेवतात असं वक्तव्यही दत्तात्रय भरणे यांनी जाहीरपणे केल्याचे पाहायला मिळालंय. दरम्यान, कृषीमंत्री झाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वादाची शक्यता आहे.  विधिमंडळातील सभागृहात रमी खेळतानाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर कोकाटे चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. मात्र त्याचा राजीनामा न घेता कोकाटेंची कृषीमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांचं खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले.

दरम्यान, कृषीमंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी हे मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, असं पहिलंच विधान केलं होतं. मात्र आता नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही अजब विधान केल्याचे पाहायला मिळाले. ‘तुमच्यासमोर मी उभा आहे. कारखान्याचा संचालक असताना काम जर मी… सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं करून पुन्हा नियमांत बसवणारं काम जे करतात त्याची माणसं नोंद ठेवतात’, असं भरणे म्हणाले. त्यांचाच मतदारसंघ असलेल्या इंदापुरात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी महसूल अधिकाऱ्यांसमोरच हे विधान केले आणि यावरून पुन्हा वादंग होण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 02, 2025 10:24 AM