औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या चटक्यापाठोपाठ आता पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत. औरंगाबाद शहराच्या पाठीमागे असलेल्या डोंगरात बसलेल्या रसूलपूर या गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मे महिन्याच्या शेवटी गाव परिसरातील नैसर्गिक पानवटे आणि विहिरी अटल्या आहेत. गावापासून 2 ते 3 किलोमीटरवर असलेल्या एका डबके वजा पाणवठ्यावरून पाणी भरावे लागत आहे. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या डबक्यातून महिलांना डोक्यावरती दोन दोन तीन तीन अंडे घेऊन भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. गाव डोंगर आणि जंगल परिसर असल्यामुळे सगळ्या महिलांना एकत्रित मिळून जावं लागतं. तर अवकाळी पावसामुळे साचलेल्या या डबक्यातील पाणी गढूळ असल्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. मात्र हे पाणी शुद्ध करून दैनंदिन कामे भागवली जात आहेत. तर गावात प्रत्येक घरात पैसे खर्च करून जारचे पिण्याचे शुद्ध पाणी विकत घ्यावे लागत आहेत. त्यामुळे या गावातले नागरिक पाण्यासाठी प्रचंड वैतागले आहेत. या गावाला चांगल्या पद्धतीचा पाणीपुरवठा करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र या मागणीकडे प्रशासनाकडून साप दुर्लक्ष होत आहे. पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. मात्र तो ही कधी येतो कधी येत नाही. त्यामुळे पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या या गावातील महिलांची भीषण वणवण सुरू आहे.