Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह….

Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह….

| Updated on: Aug 14, 2026 | 11:06 AM

गुरुवारी पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

गुरुवारी पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत यांनी अमित शाह आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत, दोघांनी मिळून बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह विकल्याचा दावा केला. शिवसेना फोडणे, राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे आणि तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणे, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे काम आहे का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

देशातील सध्याच्या परिस्थितीवरही संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. काश्मीरमधील हल्ले, मणिपूरमधील परिस्थिती, वाढती बेरोजगारी, महागाई आणि रुपयाची घसरण या मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशातील तरुणांमध्ये अस्वस्थता असून देशाची पत घसरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राऊत यांनी, “या मुद्द्यांवर पंतप्रधानांना टेलिप्रॉम्प्टरशिवाय बोलता येईल का?” असा सवाल केला. तसेच 2029 पूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सत्तेतून जावे लागेल आणि ते राजीनामा देतील, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

परराष्ट्र धोरणावरही राऊत यांनी भाष्य केले. राष्ट्राध्यक्षांना घट्ट मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नसते, अशी टीका त्यांनी केली. जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत परिस्थितीत बदल होत असून 2029 पूर्वी सत्तांतराची परिस्थिती निर्माण होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. अपात्र ठरलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आले असून हा प्रकार घटनाविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करताना राऊत यांनी आयोगाने शिवसेना पक्ष विकल्याचा आरोप पुन्हा एकदा केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसोबतच ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय आरोप-प्रत्यारोपही अधिक तीव्र झाले आहेत. आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते आणि शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम निर्णय काय होतो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Aug 14, 2026 11:06 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us