जळगाव : शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर ठाकरे आणि महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यामुळे आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात यश मिळणार नाही अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती. तर आगामी काळात शिंदे गटाचे नामोनिशान मिटणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेवर केली होती. या सर्व टीकेला शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसल्याचे सांगत जयंत पाटील यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.