एमआयएमच्या एका काडीनं शिवसेना-भाजपात पुन्हा हिंदुत्वावरुन धुसफूस सुरु झालीय. एमआयएनं मविआसोबत येण्याचा प्रस्ताव देताच आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे शिवसेना जनाब शब्द लावणार का, असा खोचक सवाल फडणवीसांना केलाय. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला पाजपा अर्थात पाकिस्तान जनता पार्टी आणि हिजबूल सेनेचं नाव दिलंय.
कोणत्याही परिस्थितीत मविआ सरकार एमआयएमसोबत जाणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. मात्र तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करु, असं जलील म्हणतायत. आता कालपर्यंत मुस्लिमविरोधी वाटणाऱ्या ठाकरे सरकारला एमआयएम अचानक एकत्र येण्याचा प्रस्ताव का देऊ लागलीय, हे कोडं आहे. म्हणजे एमआयएमचे पक्षाध्यक्ष ओवैसी सोलापुरात 2 महिन्याभरापूर्वीच जे बोलले होते, त्याच्या नेमकं विरुद्ध त्यांचेच खासदार जलील बोलतायत.
काँग्रेसनं नेहमी मुस्लिमांचा फक्त मतांसाठी वापर केल्याचा दावा एमआयएम वारंवार करत आलीय. राष्ट्रवादीचा सेक्युलरवाद ढोंगी असल्याचं ओवैसींनी वारंवार म्हटलंय. शिवसेनेचं हिंदुत्व देशाच्या ऐक्याला धोकादायक असल्याचंही ओवैसी वारंवार म्हणत आले आहेत. मग नेमकं आत्ताचं एमआयएमला एकत्रित येण्याची घाई इतकी अनावर का झाली, हा प्रश्न आहे.