राज्यातील मंदिरे सुरु करण्याची मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिरे बंद असल्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. भाजपनेही कालच मंदिराच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज यांनी आज मंदिराचा विषय हाती घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेलाच राज यांनी साथ दिल्याचं बोललं जात असून त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मंदिरे बंद ठेवण्याबाबत केंद्राचीच सूचना असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावलाय.