प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं ‘ऑपरेशन टायगर’बाबत सुचक विधान, थेट म्हणाले…
शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांवर आणि टीकांवर आपले मत मांडले आहे. चाकण येथील उद्योजकांना भेटण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांवर आणि टीकांवर आपले मत मांडले आहे. चाकण येथील उद्योजकांना भेटण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या हवाई प्रवासावर होणाऱ्या टीकेला सामंत यांनी राजकीय मत्सर म्हटले. अंबादास दानवे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, त्यांनी टीका करणाऱ्यांना आपल्या विमानातून प्रवास करण्याची ऑफर दिली, मात्र राजकारणात एवढा मत्सर योग्य नसल्याचे ते म्हणाले.
सामंत यांनी ऑपरेशन टायगर या राजकीय घडामोडीवरही प्रकाश टाकला. ऑपरेशन टायगर हे कधीही सांगून होत नाही, असे सांगत सचिन भाऊ आणि खासदारांच्या पक्षप्रवेशाचे उदाहरण दिले. तुळजापूरमधील १८ नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची किमया असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतापराव जाधव यांच्या एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री या विधानाला सामंत यांनी दुजोरा दिला. एकनाथ शिंदे सर्वोच्च पदावर असावेत ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे ते म्हणाले, जशी भाजप कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत असते. टीका करणाऱ्यांनी आधी २०२९ च्या निवडणुकीत आपले मतदारसंघ सांभाळावेत, असा सल्लाही सामंत यांनी दिला.
