नाशिकः नाशिकमध्ये पुन्हा एकदा मंगळवारी (28 सप्टेंबर) गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी आले असून, प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. नाशिकमध्ये 13 सप्टेंबर रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा पूर आला. आता आजही पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने हा वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला आहे. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज मंगळवारी दुपारी बारापासून पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा एकदा ओसंडून वाहते आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले असून, नागरिकांनी नदी क्षेत्रात जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.