मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Patients) काहीशी घट पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून (Health Department) देण्यात आलीय. तर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी आहे. त्यातील 86 टक्के रुग्ण होम क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलीय. तसंच घरच्या घरीच सेल्फ किटद्वारे चाचणी करणाऱ्या नागरिकांना टोपे यांनी महत्वाचं आवाहन केलंय. राजेश टोपे म्हणाले की, काही लोक सेल्फ किटद्वारे कोरोना टेस्ट करत आहेत. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असली तरी ते संबंधित विभागाला कळवत नाहीत. अशा लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्ती त्रास नसेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहू द्या. तुम्हाला दिवसातून फक्त दोन कॉल केले जातील आणि तुमच्यावर आरोग्यासंबंधी लक्ष ठेवलं जाईल.