भाजपच्या बंडखोर आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी
कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. फेसबुकवरुन त्यांनी यासंदर्भात घोषणा केली.
मुंबई : कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी (BJP rebel Narendra Pawar leaves party) दिली आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं नरेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टवरुन जाहीर केलं.
‘आज खूप जड अंतःकरणाने एक कटू निर्णय मला घ्यावा लागतोय. महायुतीने विधानसभा जागावाटपात शिवसेनेला कल्याण पश्चिमची जागा सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. यावरुन व्यथित होऊन मी 1 ऑक्टोबर 2019 रोजी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मी कल्याण पश्चिम विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आज मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे.’ असं नरेंद्र पवारांनी फेसबुकवरुन जाहीर केलं.
शिवसेनेने कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा भाजपकडून मागून घेतली होती. या जागेवरुन आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. अखेर विश्वनाथ भोईर यांना शिवसेनेने तिकीट दिलं. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी मैदानात आहेत. नरेंद्र पवार यांनी पक्षाने कारवाई करण्यापूर्वीच बाहेर पडणं पसंत केलं. ते आता ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हासह अपक्ष लढत आहेत.
‘अशाप्रकारे मला भारतीय जनता पार्टीपासून दूर जावे लागेल, असा साधा विचारही कधी मनात आणला नव्हता. मात्र मी कदाचित कुठे कमी पडलो, मलाही कल्पना नाही. 2014 मध्ये युती नसताना भाजपच्या तिकीटावर मी कल्याण पश्चिम विधानसभा लढवली आणि जिंकून आलो. पक्षाने मला काम करण्याची संधी दिली तेव्हा मी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम केलं.’ अशा शब्दात नरेंद्र पवारांनी आपली खदखद (BJP rebel Narendra Pawar leaves party) बोलून दाखवली आहे.
मी अविरतपणे काम करुनही आता विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमची जागा घटकपक्षाला सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. ज्या भारतीय जनता पार्टीने मला घडवलं, वाढवलं आणि माझ्यातला जनसेवक जागृत ठेऊन सेवा करण्याची प्रेरणा दिली त्या पक्षाला माझ्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये, अशी माझी भूमिका आहे. काही निर्णय वाईट असतात मात्र ते घ्यावे लागतात. आज हा निर्णय घेताना मला मनापासून दु:ख होत आहे. काम करत असताना माझ्याकडून कोणी दुखावले गेले असेल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत नरेंद्र पवारांनी पक्षाला रामराम ठोकला.
पक्षाने सांगूनही अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांची भाजपने काल हकालपट्टी केली होती. चरण वाघमारे, गीता जैन, बाळासाहेब ओव्हाळ आणि दिलीप देशमुख या उमेदवारांना पक्षाने बाहेर काढलं.
शिवसेना आणि भाजप युतीमध्ये अनेक जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या सर्वांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं. पण न ऐकल्यामुळे पक्षाने निलंबनाची कारवाई केली.
शिवसेनेकडून पाच बंडखोरांना पक्षातून हाकलण्यात आलं आहे. मात्र तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि सुरेश भालेराव या तिघा बंडखोरांबाबत शिवसेनेने ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतली आहे.