यंदा पाऊस किती पडणार? पीकपाणी कसं असेल? अल निनोचा प्रभाव कसा असेल? हवामान खात्याचा अंदाज काय?
मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असून, हवामान खात्याने यंदा अल निनोमुळे कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मिश्र पीक पद्धती, आंतरपीक आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करून योग्य पीक नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

ऐन मार्चमध्ये राज्यात पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं पीकपाणी उद्ध्वस्त झालं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरेज जावं लागत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा तर काही ठिकाणी अवकाळी अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर काय होईल, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. विचित्र हवामानाचा फटका पावसाळ्यातही बसणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून त्यावर हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने यंदा कमी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांना मिश्र पिकांचा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात ‘एल निनो’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगत पीक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र पिके, आंतरपीक पद्धती तसेच कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचा सल्ला छत्रपती संभाजी नगरच्या कृषी विभागाने दिला आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा फटका उत्पादनावर बसू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीपासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
दुबार, तिबार पेरणीची वेळ नको
दरम्यान, वर्धा जिल्हात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार समीर कुणावार यांनी प्रशासनाना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. वर्ध्यातील पोकरामध्ये समावेशित गावांचा दर तीन महिन्यांनी तालुकास्तरावर आढावा घेण्याचा सल्ला समीर कुणावार यांनी दिला आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने शेतकऱ्यांना माहिती द्यावी, अशा सूचनाही कुणावार यांनी दिल्या आहेत.
अल निनोच्या संकटाचा विचार करून शेतकऱ्यांनी यावर्षी काही प्रक्रिया राबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुबार, तिबार पेरणीची वेळ येऊ नये, कधी पेरणी करावी याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पात्र असूनही पीएम किसानचे पैसे न मिळालेल्या लाभार्थ्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. बँकांनी शेतकऱ्यांची पीक कर्ज प्रकरण वेळेत केली पाहिजे, पोकरामध्ये समावेशित गावांचा दर तीन महिन्यांनी तालुकास्तरावर आढावा घेण्यात यावा तसेच शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा, जाणीवपूर्वक जास्त भावाने खत विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई व्हावी आणि शेतकऱ्यांना योग्य दरात खत मिळण्यासाठी लक्ष देण्याचं आश्वासन पालकमंत्री यांनी दिलं असून आम्ही देखील यावर लक्ष ठेवणार असल्याचं समीर कुणावार यांनी सांगितलं.
गोंदियाला अवकाळीचा फटका
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसापासून अवकासाठी पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाला याचा सर्वात जास्त फटका पडला आहे. गोंदियातील अनेक ठिकाणच्या शेतातील धान हे खराब होण्याच्या मार्गावर आहे अनेक ठिकाणचं कापण्यास आलेला धान खाली गळून पडत असल्याचे दिसून आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
